जुन्नर – दाट धुके… फेसाळणारे धबधबे… सर्वदूर हिरवेगार वातावरण असे दृष्य दरवर्षी अनुभवण्यासाठी वर्षाविहारानिमित्त नागरिक निसर्गरम्य जुन्नर तालुक्यात पावसाळ्यच्या काळात मोठ्या संख्येने येत असतात.
मात्र, यंदा करोनामुळे वर्षाविहाराला “ब्रेक’ लागला असल्याने नाणेघाट, दाऱ्याघाट व माळशेजघाटावर शुकशुकाट पसरला आहे. तसेच या मौसमात किल्ले शिवनेरीवर येणाऱ्या शिवभक्तांची संख्या वाढत असते; मात्र, यंदा प्रथमच करोनामुळे ही सर्व ठिकाणे ओस पडली आहेत.
काही अतिउत्साही पर्यटक लपून छपून घाटमाथ्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, स्थानिक वन-व्यवस्थापन समित्या, वनविभागाचे कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा या पर्यटकांना अटकाव करत आहेत. घाटाकडे जाणाऱ्या वाहनांना पोलीस तसेच स्थानिक युवक अटकाव करत आहेत.
तर नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तालुक्यात करोना 250 च्या घरात गेला
असून पोलिसांना विविध ठिकाणी कर्तव्य बजवावे लागत आहे.
पर्यटन व्यवसाय मात्र थंडावला…
या भागांत लाखोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांवर येथील अनेकांची रोजीरोटी सुरू असते. यामध्ये फळ, वडापाव, खाद्य, सरबत विक्रेते, हॉटेल व्यवसायिक, टुरिस्ट गाड्या आदी व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. तसेच गावोगावच्या वनव्यवस्थापन समित्यांमध्ये काम करणाऱ्या स्थानिक युवकांचा रोजगार बुडाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून करोना लॉकडाऊनमध्ये शेती व्यवस्थापन चुकलेल्या ग्रामस्थांना पर्यटन बंदीचाही मोठा परिणाम होत आहे.
प्रदूषण घटले; निसर्ग बहरला
गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमालीचे घटले आहे. किल्ल्यांवरील पशु-पक्षी मुक्तपणे संचार करीत आहेत. किलबिलाट वाढला आहे. जुन्नर शहराच्या लगतच असलेल्या किल्ले शिवनेरीवरील धुक्याचे लोट रस्त्यापर्यंत येत आहेत. नदी-नाल्यांचे प्रदूषण घटले असून पश्चिम भागात अनेक गावांमध्ये डोंगरातून येणारे छोटे धबधबे मन मोहून घेत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात भात लावणी सुरू असून डोक्यावर इरले घेऊन पारंपरिक गाणी म्हणत महिला शेतीकामात व्यस्त आहेत.