सातारा/कवठे (प्रतिनिधी) – सातारा शहर, वाई तालुक्याचा ग्रामीण भागासह जिल्ह्याच्या काही भागाला बुधवारी (दि. 16) रात्री व गुरुवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने झोडपले. पाऊस व वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी या पिकांचे आणि आंब्याचा मोहर झडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे दुष्काळी तालुक्यातही पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
सातारा शहर व जिल्ह्यातील काही भागात बुधवारी रात्री व गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे खटाव तालुक्यातील डिस्कळ, बुध परिसरातील गहू, ज्वारीची पिके भुईसपाट झाली आहेत, तर गुरुवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाने गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली होती.
दरम्यान, वाई तालुक्याच्या ग्रामीण भागाला गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे ऊसतोडणी व वाहतुकीवर परिणाम झाला होता. अचानक आलेल्या पावसाने नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान होते.
तालुक्यातील काही ठिकाणी चार दिवसांत तुरळक पाऊस पडत होता. त्यानंतर गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गटारे तुडुंब भरून वाहत होती. या पावसामुळे हुरड्यातील व काढणीयोग्य झालेली ज्वारी जमीनदोस्त झाली. काही ठिकाणी वाळत घातलेल्या हळद पिकाचे नुकसान झाले.