- खेळाडूंसाठी पर्वणी : खेळाडू व क्रीडा रसिकांमध्ये उत्साह संचारला
खालापूर – ग्रामीण भागात, वाडी-वस्ती क्रिकेट खेळ हा वर्षातील पाच -सहा महिने चालत असतो. ऑक्टोबर नोव्हेंबरला सुरू होणारा खेळ मे महिना अखेरीस बंद होत असतो. त्यामुळे येथील खेळाडूंना कमीत-कमी सहा महिने विश्रांती मिळत असते. मात्र क्रिकेट खेळाची असलेली ओढी सर्व क्रिकेट रसिकांना व खेळाडून प्रोत्साहित करीत असल्याने या भागातील क्रिकेटपटू दरवर्षी दसरा सणाच्या मुहूर्तावर खेळला सुरूवात करतात. 25 ऑक्टोबर रोजी दसरा सण संपन्न झाल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामीण खेडेगावात क्रिकेट खेळाला प्रारंभ झाल्याने क्रिकेट खेळाडू व क्रीडा रसिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
रायगड जिल्ह्याला क्रिकेट खेळाचे माहेर म्हटलं जात असल्याने शहरी भागासह ग्रामीण खेडे गावात क्रिकेट खेळाचे आकर्षण वाढू लागले आहे. परंतु ग्रामीण भागात वर्षभरातील ठराविक महिनेच हा खेळ खेळला जात असल्याने ग्रामीण खेडे गावातील खेळाडूंना पाच ते सहा महिने विश्रांती घ्यावी लागत असून ही विश्रांती मैदानाअभावी घ्यावी लागत असते.
मात्र सर्वाना हा खेळ हवाहवासा वाटत असल्याने पावसाळा संपत आला की, दसरा सणाच्या मुहूर्तावर या ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली जात असल्याने 25 ऑक्टोबर रोजी दसरा अर्थात विजयादशमी सण संपन्न झाल्याने या दिवशी रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाला प्रारंभ झाल्याने क्रिकेटपटू व प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे रायगड जिल्ह्यातील युवानेते तथा कर्जत नगरीचे माजी नगराध्यक्ष राजेशदादा लाड यांनी आपले विचार व्यक्त करताना सर्व खेळाडूंनी क्रिकेट खेळाबरोबर शिक्षण-व्यवसायाकडे अधिक लक्ष केंद्रित करा, जेणेकरुन शिक्षण व व्यवसायामुळे आपले भविष्य उज्ज्वल बनेल, तर क्रिकेट खेळामुळे शरीर सुदृढ बनेल. ग्रामीण भागातील क्रिकेट सामन्यामुळे तळागाळातील सर्वसामान्य खेळाडूला आपली खेळ प्रदर्शित करता येते. त्यामुळे त्या खेळाडूला पुढे जाण्यास संधी मिळत असते, असे मत राजेश लाड यांनी व्यक्त केले.