मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेकदा हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद भरता आले नाही. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवड पार पडली.
विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं घोषित केले. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानतंर सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेलं. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना ऐकून १६४ मत मिळाली.
तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना एकूण १०७ मतं मिळाली आहेत. १०० मतं पूर्ण झाल्यानंतर टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलं. तीन आमदार तटस्थ राहिले असून यामध्ये समाजवादी पक्ष आणि एमआयएमचा समावेश आहे.