मुंबई – राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर बदल्यांचा धडाका लावला आहे. या सरकारने आज राहुल महिवाल आणि विपिन इटनकर यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सत्तापालट झाल्यानंतर सत्ताधारी पक्ष आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना महत्त्वाची खाती दिली जातात. तोच प्रकार शिंदे-फडणवीस सरकारने सुरू ठेवला असून या सरकारने दोन दिवसांत नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
पुण्यातील महिला आणि बालकल्याणचे आयुक्त राहुल महिवाल यांची पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेन्ट ऍथॉरिटीच्या (पीएमआरडीए) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर. यांना पुण्याच्या महिला आणि बालकल्याणच्या आयुक्त करण्यात आले आहे. एमएमआरडीएचे सहआयुक्त राहुल कर्डिले यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जयश्री भोज व शेखर सिंग यांच्यासह अन्य तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.