नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र पाठवून संसदीय समितीच्या बैठकीत बोलू न दिल्याची तक्रार केली. राहुल यांनी सभापतींकडे हस्तक्षेपाची मागणी केली.
संरक्षणविषयक संसदीय समितीची बुधवारी बैठक झाली. त्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी सशस्त्र दलांच्या गणवेशाचा मुद्दा उपस्थित करण्यावर राहुल यांनी आक्षेप घेतला. बैठकीत समितीचे अध्यक्ष असणारे भाजपचे नेते जुअल ओराम यांनी त्यांना अधिक बोलण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे नाराज झालेले राहुल आणि कॉंग्रेसचे सदस्य बैठकीतून बाहेर पडले.
आता राहुल यांनी बिर्ला यांना पत्र पाठवून संसदीय समित्यांच्या बैठकांमध्ये खासदारांना त्यांची भूमिका मांडू देण्याची निश्चिती करण्याचे साकडे घातले आहे. संरक्षणविषयक समितीवर असणाऱ्या जबाबदारीशी निगडीत चर्चा असावी, अशी अपेक्षाही राहुल यांनी पत्रातून व्यक्त केली. त्यांना आणि कॉंग्रेस सदस्यांना प्रामुख्याने सीमेवरील चीनी कुरापतींचा मुद्दा बैठकीत मांडायचा होता. मात्र, बोलण्याची संधी न मिळाल्याने त्यांनी वॉकआऊट केले.