चेन्नई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी श्रीपेरुंबुदूर येथील राजीव गांधी स्मृतिस्थळावर 7 सप्टेंबर रोजी श्रद्धांजली अर्पण करून तेथे ध्यान करणार आहेत आणि ते कन्याकुमारीपासून देशव्यापी भारत जोडो यात्रा सुरू करणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या वतीने आज देण्यात आली. 1991 साली राजीव गांधी यांची श्रीपेरूंबुदूर येथे हत्या झाली होती. या ठिकाणाला राहुल गांधी यानिमित्ताने प्रथमच भेट देणार आहेत.
कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, के सेल्वापेरुंथगाई यांनी पीटीआयला ही माहिती दिली. कॉंग्रेस पक्षाच्या सूत्रांनी म्हटले आहे की श्रीपेरुंबुदूर येथे या सोहळ्यासाठी आणि पक्षाच्या देशव्यापी यात्रेचे उद्दिष्ट लक्षात घेऊन योग्य व्यवस्था केली जाईल याची खात्री करण्याचे काम सुरू आहे.
केंद्रातील भाजपची राजवट उखडून टाकण्यासाठी, राष्ट्रवादी भावना जागृत करण्यासाठी भारत जोडो यात्रेत जनजागृती केली जाणार आहे. ही यात्रा तामिळनाडूमध्ये 7 ते 10 सप्टेंबर असे चार दिवस चालणार आहे. दुसऱ्या दिवसापासून ही यात्रा शेजारच्या केरळमधून सुरू राहणार आहे.