कोलकाता – भारतीय संघाचा कोणता कर्णधार सर्वात सरस आहे महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली की रोहित शर्मा असा प्रश्न विचारला गेल्यावर बीसीसीआयचे अध्यक्ष व भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी या दोघांशी रोहितची तुलना करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
हे तिनही खेळाडू मोठे आहेत. त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. धोनी किंवा कोहलीपेक्षा रोहित सरस आहे का अशा चर्चाच करणे गैर आहे. धोनीने बराच काळ नेतृत्व केले तसेच कोहलीनेही संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. आता रोहितच्या नेतृत्वाची ही तर सुरुवात आहे. लगेचच त्याच्या कामगिरीचे समिक्षण करणे बरोबर नाही. त्याला वेळ द्यावा लागेल, असेही गांगुली म्हणाले.
वर्कलोड मॅनेजमेंट, करोनाचा काळ व सातत्याने खेळाडूंना होत असलेल्या दुखापतींमुळे यंदाच्या मोसमात भारताने केवळ सहा महिन्यांत सात कर्णधार पाहिले. कोहलीने नेतृत्व सोडल्यावर ही जबाबदारी रोहितवर आली. आतापर्यंत तरी त्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मात्र, त्याला थोडा वेळ द्यायला हवा. एका दिवसात कोणी महान होत नाही. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे त्यामुळे त्याचे नेतृत्व यशस्वी आहे हे तर स्पष्ट दिसते. त्याने आयपीएल स्पर्धेत जशी वैयक्तिक कामगिरीसह संघाच्या कामगिरीतही सुधारणा होण्यासाठी काही योजना केल्या व त्या यशस्वीपणे राबवल्या तेच आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते सिद्ध करायचे आहे, असेही गांगुली यांनी सांगितले.
प्रत्येकाची शैली भिन्न
धोनी, कोहली किंवा रोहित यांच्या नेतृत्वाबाबत बोलायचे तर या प्रत्येकाची शैली भिन्न आहे. संघातील खेळाडूंची बलस्थाने तसेच कमकुवत दुवे हेरून त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करुन गेण्यात मात्र, हे तिघेही हुशार आहेत यात शंका नाही. आता जे यश धोनी किंवा कोहलीने मिळवून दाखवले तेच रोहितलाही सिद्ध करावे लागणार आहे. एकाच मोसमात लगेच एखाद्या कर्णधाराला महान बनवणे योग्य नाही, अशी पुष्टीही गांगुली यांनी जोडली आहे.