नवी दिल्ली – मोदी सरकारविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडणारे काँग्रेसचे नेते ‘राहुल गांधी’ यांना आज (दि. 24) मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.
त्यांनी या सभेत,” नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का असतात ? असा सवाल जाहीर सभेत केला होता. राहुल यांच्या या वक्तव्याबाबत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.
भाजप आमदाराने आरोप केला होता की, 2019 मध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना, सर्व चोरांना मोदी हे आडनाव का आहे, असे म्हणत राहुल यांनी संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी केली असल्याचा आरोप पूर्णेश मोदी यांनी केला होता. याच प्रकरणात कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. पण दोन वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची आता खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे.