मुंबई – राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत 2019मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला आहे. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना न्यायालयापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते.
याचप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी न्या. संदीप शिंदे यांच्यापुढे बुधवारी सुनावणी पार पडली. मात्र राहुल गांधी यांचे वकील न्यायालयात वेळेत उपस्थित राहू न शकल्यामुळे ही सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली.
राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर “कमांडर इन थीफ’, “चौकीदार चोर है’, “चोरो का सरदार’अशी टीका केली होती. यामुळे मोदी यांच्यासह भाजप आणि त्यातील सदस्यांचीही प्रतिमा मलिन झाली आहे.
त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमाळ यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या वक्तव्यांचा या याचिकेत समावेश आहे.