नवी दिल्ली: केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरकडे धाव घेतली आहे. केरळातील पुरस्थिती लक्षात घेऊन तेथील शेतकऱ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत कर्जवसुली केली जाऊ नये अशी मागणी त्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. केरळातील सुमारे दोन लाख लोकांना पुरामुळे विस्थापित व्हावे लागले असून त्यांना मदत छावण्यांमध्ये आश्रयघ्यावा लागला आहे. या शतकातली ही सर्वात भीषण स्थिती आहे असे राहुल गांधी यांनी त्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. यात पिकांची अतोनात हानी झाल्याने सर्वच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असल्याने त्यांना ही कर्जफेड वेळेत करणे शक्य नसल्याने त्यांना कर्जफेडीची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून बॅंकांनी आता सक्तीने कर्जवसुली सुरू केल्याने त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. राज्यपातळीवरील बॅंकर्सच्या समितीने अशा प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आम्हाला आता तुमच्याकडून योग्य प्रतिसादाची आवश्यकता आहे असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. राहुल गांधी हे आता केरळातील खासदार असून त्यांनी नुकताच आपल्या मतदार संघातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी तिकडे दौरा केला होता.