नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या युरोपच्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी प्रदेशात जाऊन देशातील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी भारतातील लोकशाही संस्थांवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला केला जात आहे आणि देशाच्या लोकशाही रचनेला धक्का देण्याच्या प्रयत्नांबद्दल युरोपीय महासंघाच्या (ईयू) काही देशांना चिंता वाटते असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केले.
युरोपच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल यांनी शुक्रवारी ब्रसेल्स येथे पत्रकार परिषदेत बोलताना आपल्या जुन्या आरोपांचा पुनरुच्चार केला. राहुल यांचा युरोपमधील तीन देशांचा दौरा बेल्जियम भेटीने सुरू झाला. गुरुवारी त्यांनी ब्रसेल्स येथे युरोपीय महासंघाच्या काही सदस्यांशी बंद खोलीमध्ये चर्चा केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, यावेळी मणिपूरमधील मानवाधिकाऱ्यांच्या स्थितीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. जुलैमध्ये युरोपीय महासंघाच्या पार्लमेंटने मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करून ठराव संमत केला होता. ब्रसेल्समधील चर्चा यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले.
भारतामध्ये अलीकडेच देशाच्या नावावरून उद्भवलेला वाद ही विरोधी पक्षांच्या ऐक्यामुळे सरकारची भीतीपोटी आलेली प्रतिक्रिया आहे आणि लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे अशी टीका राहुल यांनी केली.