Rahul Gandhi On Narendra Modi – पंतप्रधान मोदींनी पुन्हा प्रचारात विषारी भाषा वापरणे सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यातच त्यांना पराभव स्पष्ट झाल्याने त्यांनी ही भाषा सुरू करून लोकांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयोग पुन्हा सुरू केला असला तरी त्यांच्या या खोटारडेपणाच्या धंद्याचा अंत जवळ आला आहे असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील एका जाहीर सभेत मनमोहनसिंग यांच्या दहा बारा वर्षापुर्वी केलेल्या एका भाषणाचा संदर्भ देत कॉंग्रेस तुम्ही कष्टाने कमावलेली संपत्ती देशातील अशा घुसखोरांना देणार आहे ज्यांना जास्त मुले आहेत असे विधान केले हेाते. त्यावरून राहुल गांधी यांनी हा हल्ला चढवला आहे. काँग्रेस पक्षानेही पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले. । Rahul Gandhi On Narendra Modi
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आपल्या सरकारची निराशाजनक कामगिरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी आता मनमोहनसिंग यांच्या एका वक्तव्यावरून पुन्हा खोटेपणाचा आधार घेत विखारी भाषेचा वापर सुरू केल्याचे म्हटले आहे. मोदींकडे लोकांचे लक्ष अन्यत्र विचलीत करण्यासाठी अनेक हतखंडे आहेत परंतु त्यांच्या या लबाडीच्या धंद्याचा अंत जवळ आला आहे असे राहुल गांधी यांनी महटले आहे.
वाढत्या किमती आणि बेरोजगारीवर लक्ष केंद्रित करणारी काँग्रेसची ताजी जाहिरात शेअर करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, देशात बेरोजगारी आणि महागाई शिगेला पोहोचली असताना देशात सगळे काही ठीक चालले आहे असा मोदींचा दावा असतो.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही पंतप्रधानांवर हल्ला चढवला.पंतप्रधान बऱ्याच मुद्द्यांवर विषारी भाषेत बोलतात.
त्यांनी एका साध्या प्रश्नाचे उत्तरही दिले पाहिजे – 1951 पासून, दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. त्यातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची वास्तविक आकडेवारी समोर येते. नवीन जनगणना २०२१ मध्ये करणे अपेक्षित होते पण त्यांना ती अजून का करता आली नाही हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याचा हा डाव आहे, असा आरोप रमेश यांनी केला. । Rahul Gandhi On Narendra Modi