नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधातील आंदोलना दरम्यान, मेरठमध्ये मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी मेरठ येथे दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी मेरठ शहराबाहेरच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या गाडीचा ताफा अडवला. मृत आंदोलकांच्या कुटुंबियांची भेट न घेताच पोलिसांनी त्यांना माघारी लावले. कलम 144 लागू असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये आंदोलन करण्यात आले होते. मेरठमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण आले होते. या आंदोलनावेळी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. तसंच अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी, प्रमोद तिवारी यांच्यासह कॉंग्रेसचे अन्य नेते मृतकांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी दिल्लीवरुन मेरठ येथे आले होते.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या गाडीचा ताफा मेरठ शहराच्या परतापूर भागामध्ये दाखल होताच पोलिसांनी अडवला. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी यांना मेरठ शहरामध्ये कलम 144 लागू असल्याची नोटीस दाखवली. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या गाडीचा ताफा दिल्लीकडे रवाना झाला आहे.