ग्राहकांकडून मागणी नसल्याचा परिणाम
पुणे – पुणे, ठाणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीमध्ये नव्या घरांच्या पुरवठ्यामध्ये मोठी घट झाल्याचे आढळून आले आहे.
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत पुण्यामध्ये झालेल्या नव्या घराच्या पुरवठ्यात तब्बल 44 टक्क्यांची घट झाली. या कालावधीमध्ये पुण्यामध्ये केवळ 6 हजार 341 घरे उपलब्ध झाली तर, मुंबईतील हे प्रमाण केवळ 1,882 इतके युनिटस् आहे. ठाणे शहरातील नव्या घरांचा पुरवठा 49 टक्क्यांनी कमी होऊन तो केवळ 4,490 युनिट्स एवढा झाला आहे.
“क्रॉप इक्विटी’ या संस्थेने मोठ्या शहरांतील घरासंबंधिच्या आकडेवारीचे संकलन करून नवी घर निर्मिती कमी झाल्याचा दावा केला आहे. घर निर्मिती पातळीवर बरीच भांडवल सुलभता उपलब्ध झाली असली तरी “रेरा’ आणि इतर कारणांमुळे घर निर्मितीवर नकारात्मक परिणाम कायम असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. त्याचबरोबर ग्राहकांकडून मागणीच कमी असल्यामुळे नव्या घरांच्या योजना कमी झाल्या असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर, देशभरातील इतर राज्यांतील मोठ्या शहरांतही नव्या घर निर्मितीची आकडेवारी निराशादायक असल्यामुळे या क्षेत्राला चालना देण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले नसल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि नोएडा येथील परिस्थिती तर विदारक आहे. याठिकाणी एकही नवी योजना या तिमाहीत सुरू झालेली नाही. गुडगावमध्ये या तिमाहीमध्ये केवळ 80 नवी घरे झाली.
दक्षिणेतील काही शहरांतील परिस्थिती थोडीशी सकारात्मक
दक्षिणेतील काही शहरांतील परिस्थिती मात्र, थोडीशी सकारात्मक आहे. हैद्राबादमध्ये या तिमाहीत नव्या घरांची संख्या 22 टक्क्यांनी वाढून 4,797 युनिटस् एवढी झाली आहे. बंगळुरु शहरातील नव्या घरांची संख्या 1 टक्क्यांनी वाढून 950 युनिटस् एवढी झाली आहे. चेन्नई येथील नव्या घरांची निर्मिती 8 टक्क्यांनी वाढून 2,749 युनिट्स आणि कोलकत्ता येथील नव्या घरांची निर्मिती 5 टक्क्यांनी वाढून 2,816 युनिट्स एवढी झाली असल्याचा दावा या अहवालामध्ये करण्यात आला आहे.