नवी दिल्ली- जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर तेथील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या शिष्टमंडळाला आज श्रीनगरच्या विमानतळावरून दिल्लीला माघारी पाठवण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये कॉंग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, द्रमुक, राजद, तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलातील नेत्यांच्या समावेश होता.
गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सिताराम येचुरी, शरद यादव, मनोज झा, मजीद मेमन, तिरुची सिवा आणि डी. राजा यांचा समावेश असलेले हे शिष्टमंडळ आज सकाळीच श्रीनगरला गेले होते आणि परत पाठवल्यामुळे संध्याकाळी दिल्लीला परत पोहोचले. केवळ जम्मू काश्मीरमधील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठीच तेथे जात आहोत. तेथे कोणतीही अस्वस्थता निर्माण करण्याचा आपला हेतू नसल्याचे दिल्लीवरून निघत असताना या शिष्टमंडळाने पत्रकारांना सांगितले होते.
“जर जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सरकारच्या म्हणण्याप्रमाणे सर्वसामान्य असेल तर राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील विरोधकांचा शिष्टमंडळाला तेथून माघारी का पाठवण्यात आले? मोदी सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे ?’ असा प्रश्न कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.
यापूर्वी 20 ऑगस्टला जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयातल्या बैठकीसाठी जाणाऱ्या राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनाही जम्मूच्या विमानतळावरून माघारी पाठवण्यात आले होते. त्यापूर्वी 9 ऑग्स्ट्लआ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सिताराम येचुरी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते डी. राजा यांना श्रीनगरच्या विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमधील राजकीय नेत्यांना केंद्र सरकारकडून खबरदारी म्हणून स्थानबद्ध करण्यात आले आहे.