ऊस लागवड थांबविण्याची शक्यता : भात झोडणी करणाऱ्यांची लगीनघाई
नाणे मावळ – गेल्या दोन दिवसांपासून नाणे मावळात ढगाळ व पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतपीके धोक्यात येतात की काय अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. मावळात गहू, हरभरा, कांदा या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सध्या गहू व हरभरा ही पिके अंतिम टप्प्यात अपेक्षित होती. परंतु अवकाळी पावसाने पिकांचे शेतीचे नियोजन बिघडले.
गेल्या महिन्यात हवामानाने चांगली साथ दिल्याने पिके बहरली असली तरी हवामानातील बदलाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. त्याची उगवण चांगली झाली आहे. मोठा खर्चही केला. आता अंतिम टप्प्यात पीक आले असताना अवकाळी पाऊस, गारपिटीचा धोका उद्भवतो का, या शंकेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. त्यातच मागील दोन दिवस ढगाळ हवामान झाल्याने अनेकांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
पिकांवरील रोग दूर करण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. पीक हातात येऊ लागताच निसर्ग काय करतो यावरच सर्व काही अवलंबून आहे. मागील वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी अनेक शेतकऱ्यांना लहरी निर्सगाचा फटका बसून, त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
पिकावरील किडी व रोगांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे कीडनाशके फवारणीचा खर्च वाढत आहे. किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यांचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे. पाऊस, सूर्यप्रकाश, तापमान, सकाळची आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान, धुके या सर्व बाबी हवामान बदलाशी निगडित आहेत. या गोष्टींवर थोडा अधिक प्रकाश टाकू टाकणे गरजेचे आहे.
तापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण
तापमान कमी असल्यास आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते. तापमान वाढताच आर्द्रता कमी होते; मात्र तापमान आणि आर्द्रता हे दोन्ही घटक काही वेळा कीड आणि रोग हे दोन्ही घटक मोठ्या प्रमाणात फैलावण्यास अनुकूल ठरतात. त्यामुळेच हवामानातील बदलांचा पिकांना कीड आणि रोगामुळे मोठ्या प्रमाणात उपद्रव होऊ शकतो. उन्हाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाश, अधिक तापमान आणि कमी प्रमाणात उपलब्ध असलेली आर्द्रता ही कीड आणि रोग पसरण्यास प्रतिबंध करते. त्यामुळेच उन्हाळी हंगामात पिके किडी-रोगांपासून बचावतात. त्यामुळेच पिकांचे उत्पादनही अधिक आणि मालाची प्रतही चांगली मिळते.
धुके आणि दव..
सकाळी धुके पडल्याने हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक काळ राहते. त्यातच दव पडल्यास पिकांचे भाग ओले राहतात आणि बुरशीजन्य रोगांचा फैलाव होतो. पिकांच्या कोवळ्या भागास विशेष करून इजा पोचते. याचा फटका भाजीपाला व कांदा पिकास मोठ्या प्रमाणात जाणवतो.