नवी दिल्ली – करोना व्हायरस संदर्भातील माहिती देण्यासाठी केंद्र सरकारकडून “आरोग्य सेत’ नावाचे एक ऍप आणले आहे. हे ऍप सर्व खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. या ऍपबाबत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही एक प्रकारे लोकांवर पाळत ठेवण्याची सिस्टीम आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, या ऍपद्वारे लोकांची खासगी माहितीची चोरी आणि त्यांच्या खासगीपणाचा भंग होऊ शकतो. हे तंत्रज्ञान आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे, पण या भीतीदायक वातावरणाचा उपयोग करून लोकांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर माग ठेऊ नये, असे म्हटले आहे.
याला उत्तर देताना भाजपचे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले की, आरोग्य सेतू ऍप शक्तिशाली ऍप असून लोकांची सुरक्षा करत आहे. ज्या लोकांनी आपले पूर्ण आयुष्य दुसऱ्यांवर लक्ष ठेवण्यात घालवले, त्यांना तंत्रज्ञानाचा वापर चांगल्यासाठीही करता येतो, हे कुठे माहीत असणार? जे भारताला समजू शकत नाही त्यांचे ट्विटर बंद केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.