नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकरी संघटना आणि सरकारमधील चर्चेआधी दिल्लीमध्ये ही भेट होणार आहे. एकीकडे शेतकरी आंदोलनावरुन पंजाब सरकारची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. त्यातच ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह याआधीही अमित शाहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. परंतु त्यावेळी शाह आणि त्यांची भेऊ होऊ शकली नव्हती.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह सातत्याने केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या संघर्ष योग्य असल्याचे सांगत तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज का ऐकत नाहीत? आणि या मुद्द्यावर हट्टाची भूमिका का असे सवालही उपस्थित केले होते.
आमचे सरकार या काळ्या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचा पुनरुच्चारही अमरिंदर सिंह यांनी केला. ते म्हणाले की, “जनतेचे ऐकणे हे सरकारचे काम आहे. जर अनेक राज्यांचे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत तर याचा अर्थ आहे की ते खरोखरच दु:खी आहेत.”
यासोबतच हरियाणात शेतकऱ्यांच्या आंदोलनात बळाचा वापर केल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
अमरिंदर सिंह यांनी यावरुन हरियाणा सरकारवर टीकास्त्र सोडले होते अशा परिस्थितीत अमित शाह यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीत शेतकऱ्यांची मनधरणी करण्याबाबत मार्ग निघेल अशी अपेक्षा केली जात आहे.