पुणे – शहरासह ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढत आहे. विशेषत: विविध कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक दररोज जिल्हा परिषदेत येतात. त्यात मार्च अखेरमुळे या गर्दीत आणखीन भर पडली. त्या पार्श्वभूमीवर करोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा परिषद मुख्यालयात ज्याप्रकारे निर्बंध घातले होते त्याचप्रमाणे आताही लावण्याबाबत नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
त्यामध्ये टपाल किंवा कार्यालयीन कामकाजासाठी कागदपत्रे स्वीकारण्यासाठी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ कक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच, अभ्यागतांच्या भेटीसाठी पासची व्यवस्था करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
मास्क नसेल तर मुख्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही. सध्या मार्च अखेरमुळे जिल्हा परिषदेत गर्दी वाढली आहे. अनेकांकडून करोना नियमांचे उल्लंघन होताना दिसते. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यालय इमारतीतील गर्दी कमी करण्यासाठी तसेच संसर्ग होऊ नये यासाठी अनावश्यक बाबी कमी केल्या जातील. बाहेरून येणाऱ्यांना प्रत्येक विभागातून पास देण्याची व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे.
– महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), जि.प.पुणे