पुणे – येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे २०१५ पासून कार्यरत असलेले अधीक्षक यु टी पवार यांची शासनाने नवी मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे बदली केल्याचे आदेश काढले.
पवार यांनी तब्बल सहा वर्षे चार महिने येरवडा मध्यवर्ती कारागृह प्रशासन, सुरक्षा, विविध उपक्रम, covid-19 ची कठीण परिस्थिती हाताळत अत्यंत उत्कृष्टपणे आपला कार्यकाळ गाजवला.
कडक शिस्तीचे, गरीब कैद्यांचे पालक, वक्तशीर, प्रशासकीय गतिमानता, कारभारातील पारदर्शकता, मनमिळावू स्वभाव व सर्व अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता यामुळे त्यांचा येरवडा येथील प्रदीर्घ कार्यकाल उल्लेखनीय ठरला. सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्ती संशोधक, वैज्ञानिक, कलाकार, समाजसेवक अशा विविध व्यक्तिमत्त्वांना कारागृहात उपक्रमा निमित्ताने आमंत्रित करून बंदी जनांचे मनोरंजन, प्रबोधन, करण्याचे स्तुत्य उपक्रम त्यांनी राबविले.
जेणेकरून बंदी यांना शिक्षेच्या कालावधीत सकारात्मक विचारसरणीने जगता यावे. सलग चार वर्षे काराग्रह उत्पादनात महाराष्ट्रात येरवडा मध्यवर्ती कारागृहाचा अव्वल क्रमांक राहिला. दिवाळी आणि रक्षा बंधन मेळावा या दरवर्षीच्या उपक्रमातून कारागृह विभागास लाखोंचे उत्पन्न मिळाले. कारागृह हे केवळ बंदी जनांची शिक्षा उपभोग घेण्याचे ठिकाण नसून येथे त्यांचे पुनर्वसन देखील केले जाते.
बंदी त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांनी निर्मित केलेल्या वस्तूतून शासनास उत्पन्न देखील मिळते. हा संदेश समाजात पोहोचवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. येरवडा सारख्या संवेदनशील कारागृहात अत्यंत अचूक प्रशासन व सुरक्षा व्यवस्था राखण्यात त्यांचा हातखंडा होता. सध्या त्यांची बदली शासनाने तळोजा येथे केलेली आहे.