महानगरपालिकेच्या उंबरठ्यावरील काही गावे घेणार निर्णय
– महादेव जाधव
फुरसुंगी – पूर्व हवेली तालुक्यातील पिसोळी, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक ही गावे महापालिकेत समावेशाच्या उंबरठ्यावर असताना या गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे संभ्रमावस्थेत असलेल्या काही गावांनी आता ग्रामपंचायत निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शेवाळेवाडी, हांडेवाडी तसेच वडाचीवाडीतून एक काय तो निर्णय घ्या…, अशी मागणी होत आहे.
पुणे शहरालगतची गावे पालिकेत घेण्याची प्रक्रिया तसेच ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया एकाच वेळी सुरू असल्याने अशा गावांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बुधवारी (दि.23) राज्य शासनाचे याबाबतचा अध्यादेशा जारी केला असून दि. 23 जानेवारीपर्यंत हरकती नोंदवायच्या आहेत.
तर, ग्रामपंचायती निवडणुकीसाठी अर्ज भरणे, माघार घेणे याचे वेळापत्रकही या दरम्यान असल्याने आता हरकती नोंदवाच्या की ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरायचा, अशा द्विधा मन:स्थितीत गाव कारभारी अडकले आहेत. यामुळेच काही गावे आता ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार करीत आहेत. तर, काही ठिकाणी मात्र गाव पालिकेत गेल्यानंतरही परिसरामध्ये आपले वर्चस्व कायम राहावे. तसेच, पुढे पालिका निवडणुकीत याचा ऍडव्हान्टेज घ्यावा, अशा विचारातून काही गावातील गाव पुढारी मात्र जोमाने कामाला लागले आहेत. त्यातही भरीस भर म्हणून आता गाव पालिकेत जाणार आणि सरपंचपदाचे आरक्षणही रद्द झाल्याने बहुतांशी गावात भावी सरपंच म्हणून मिरवणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
त्यातही “राजकीय हौसे’लाही निवडणूक तिकीटाची गरज नसते…, म्हणून की काय आता हेच भावी सरपंच, भावी नगरसेवक होण्यासाठी इच्छुक झाले आहेत. तर, सौभाग्यवतींना ग्रामपंचायत सदस्य करण्याच्या तयारीत असलेली मंडळी मात्र नाराज झाली आहेत. अशा या गुंतागुंतींच्या वातावरणात पालिकेत समावेश होणाऱ्या बहुतांशी गावांतील ग्रामस्थ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फारसे उत्सुक दिसत नसल्याचेही चित्र आहे. यातून गावची निवडणूक झालीच तर गावांतील नागरिक मतदानासाठी बाहेर पडतील का? याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.
वडकीत चुरशीची निवडणूक…
हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील वडगी गावाचा येथील राजकारणात नेहमीच दबदबा राहिला आहे. त्यामुळे या गावातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्या गटाची सत्ता आणण्याकरिता सज्ज झाले आहेत. अन्य गावात ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला जात असला तरी येथे मात्र जोरदार तयारी सुरू आहे. विरोधी गट निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. जोडा-फोडा रणनीती वापरुन वजनदार कार्यकर्ते आपल्या गटाकडे खेचण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे वडकी गावात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.