पुणे – डिजिटल युगात पुण्यातील व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. दुसऱ्या व्यापाऱ्याला आपला स्पर्धक समजू नका, तुमची स्पर्धा आॅनलाइन बाजारपेठेसोबत आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मॉल तयार करा, असा सल्ला संगणक तज्ज्ञ डाॅ. दीपक शिकारपूर यांनी दिला.
स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशन, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, लायन्स क्लब ऑफ शिवाजीनगर भाजपा कसबा मतदार संघ व्यापारी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापार क्षेत्रातील आधुनिकतेचा राजमार्ग डिजिटल मार्केटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संगणक तज्ज्ञ डाॅ. शिकारपूर, कृत्रिम बुद्धिमत्तेचे अभ्यासक अमेय पांगारकर यांचे व्याख्यान झाले. यावेळी नितीन पंडित, सचिन जोशी, जीवन हेंद्रे, मदनसिंग रजपूत, संजय मुनोत, संजीव फडतरे, विकास पवार, चकोर सुगंध, किरण चव्हाण, राजेश शिंदे उपस्थित होते.
स्मार्टफोन वापरात भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सगळे काही डिजिटल होत असताना आपण त्यापासून लांब राहू शकत नाही, परंतु त्याच्या आहारी देखील जाऊ नये. तुळशीबाग आणि लक्ष्मी रोडवर व्यवहार करणे हा अनुभव असतो. या गोष्टीचा अनुभव ऑनलाइन मिळू शकत नाही. पारंपारिक व्यवसाय तंत्रज्ञानाने मोठा करता येतो, असे डाॅ. शिकारपूर म्हणाले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. ए आय तंत्रज्ञान वापरण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक येतो. बंगळुरू आणि पुण्यामध्ये सर्वाधिक एआय टूल्स वापरण्यात येतात. व्यापाऱ्यांनी आपला व्यापार मोठा करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली पाहिजे, असे डॉ. पांगारकर म्हणाले.
“जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी तंत्रज्ञान वापरा. जितक्या लवकर डिजिटल युगातील तेवढे व्यापाऱ्यांसाठी चांगले आहे. तुळशीबाग हा ब्रँड खूप मोठा आहे. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून त्याला जागतिक पातळीवर पोहोचवा.” – डाॅ. दीपक शिकारपूर, संगणक तज्ज्ञ