पुणे – करोनानंतर आता कुठे व्यापार पूर्वपदावर येत असतानाच महापालिकेने 200 पट भाडेवाढ केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांपुढे जगावे की मरावे? हा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे सांगत महात्मा फुले मंडईतील शेतमाल व्यापारी संघटनेच्या वतीने महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मंडईतील या व्यापारावर जवळपास सहा हजार कामगारांचा उदरनिर्वाह असून महापालिकेने आडमुठेपणाची भूमिका न सोडल्यास या सर्वांवर उपासमारीची वेळ ओढावणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
शहरातील हजारो नागरीक फळे आणि भाज्या घ्यायला मंडईत येतात. मंडईत किरकोळ आणि घाऊक व्यापार करणारे सुमारे दोन ते अडीच हजार व्यापारी शेतमालाचा व्यापार करतात. त्यासाठी महापालिकेने महात्मा फुले मंडईत 1500 गाळे भाडे तत्त्वावर व्यावसायीकांसाठी दिले आहेत. त्यातील काही गाळे पक्क्या आणि कच्या स्वरुपाचे आहेत. त्यानुसार त्यांच्याकडून मासिक, सहामाही आणि वार्षिक भाडे घेतले जाते. महापालिकेने भाडेवाढ करण्यापूर्वी 250 पासून ते 900 रुपयांपर्यंत मासिक भाडे होते. मात्र, आता नवीन भाडेवाढ पालिकेच्या जागावाटप नियमावलीनुसार केली असून हे भाडे 7 हजार 668 पासून ते 1 लाख 24 हजार रुपयांवर गेले आहे. तर, महापालिकेने मागील दोन वर्षांपासून नवीन दराने करार केल्याशिवाय भाडेही घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आता व्यावसायिकांना थेट दोन वर्षांचे भाडे देण्याच्या नोटीस आल्या आहेत.
भाडेवाढ ही महाराष्ट्र राज्य मिळकत वाटप नियमावली 2008 नुसार आहे. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापण विभागाने ठरवून दिल्यानुसार केलेली आहे. यापूर्वी व्यापाऱ्यांना याची पूर्व कल्पना दिली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आरोप निराधार आहेत.
– ए. पी. मंद्रुपकर, मंडई अधिकारी
दोन वर्षांपासून मंडईत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे व्यापारावर परिणाम झाला आहे. तसेच करोनामुळे अगोदरच व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. काही व्यापाऱ्यांना 7 ते 8 लाख रुपये भरण्याची नोटीस आली आहे. महिन्याचा व्यवसायसुद्धा पालिकेच्या नवीन भाडे एवढा होत नाही. तर, इतकी रक्कम आम्ही भरायची कशी.
– राजेंद्र कासुर्डे, अध्यक्ष, शेतमाल व्यापारी संघटना