पुणे –उजनी धरण परिसरात पर्यटन केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) सहा हेक्टर जागेची मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली आहे. त्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून यावर निर्णय न झाल्याने “एमटीडीसी’ला जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे जागेअभावी उजनी धरण परिसरात पर्यटन केंद्राचे काम रखडले आहे.
उजनी धरण परिसरात येणारे परदेशी पक्षी, विस्तीर्ण असा जलाशय, मावळतीच्या सूर्याचे पाण्यात उमटणारे प्रतिबिंब आदी गोष्टींचे मनोहरी सौंदर्याचा आनंद पर्यटकांना लुटता यावा, यासाठी या परिसरात पर्यटन केंद्र उभारण्याचे नियोजन “एमटीडीसी’ने केले आहे. उजनी धरण परिसराला अनेक पर्यटक दरवर्षी भेट देतात. उजनी धरण हे पर्यटकांचे हक्काचे ठिकाण व्हावे, याठिकाणी पर्यटक येऊन येथील नवनवीन गोष्टींची माहिती त्यांना व्हावी, यासाठी विशेष असे प्रयत्न होताना दिसत नव्हते. आता उजनी धरण पर्यटकांसाठी नवे डेस्टिनेशन होण्यासाठी “एमटीडीसी’ने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाकडे असलेल्या जागेची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, जलसंपदा विभागाकडून अजूनही सकारात्मक निर्णय झालेला नाही. या प्रस्ताव मान्य झाल्यास पर्यटकांना निसर्ग सौंदर्यांचा आनंद घेता येणार आहे. त्याचबरोबर रोजगारच्या संधीही स्थानिक नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
उजनी धरणात अनेक ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर जुने वाडे, पूल ही पाण्याखाली गेले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरले तरी काही मंदिरांचे कळस दिसतात. धरणातील पाणी कमी होत गेल्यास साधारणपणे मे महिन्यात ही मंदिरे संपूर्ण दिसतात. या ठिकाणी पर्यटक आणि नागरिक भेट देतात. संपूर्ण धरणात पाणी असतानाही ही मंदिरे आणि वाडे पहाता यावेत, यासाठी या ठिकानी स्कूबा डायव्हिंग सुरू करण्याचे नियोजन आहे.
धरण क्षेत्रात निसर्गाचा आनंद घेता येणार
यापूर्वी एमटीडीसीने चासकमान, कोयना, पानशेत, भामा आसखेड, पवना आदी धरणांच्या परिसरात पर्यटन केंद्र उभारली आहेत. त्यामुळे धरण क्षेत्रातील निसर्गाचा आनंद घेता येतो. याठिकाणीच राहण्याची सोय होत असल्याने पर्यटकही या ठिकाणांना पसंती देतात. त्यामुळे “एमटीडीसी’ने उजनी धरण येथे पर्यटक केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला.