पुणे – करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, किती विद्यार्थ्यांनी या शुल्कमाफीचा लाभ घेतला याची माहिती शासनाकडे नसल्याचे माहिती अधिकारातून काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. आता विधानसभा अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे शुल्कमाफी दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याची तयारी सुरू केली आहे.
करोनामुळे आई, वडील, पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यानंतर राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर स्टुडंट हेल्पिंग हॅंडचे कुलदीप आंबेकर यांनी माहिती अधिकारात अर्ज करून करोनामुळे पालक गमावल्याने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन शुल्क माफी मिळालेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागितली होती. मात्र, संबंधित माहितीचा अहवाल प्राप्त न झाल्याचे उत्तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले होते.
माहिती संकलित करण्यासाठी धावाधाव
आता आमदार राजहंस सिंह यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये याचसंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली आहे. त्यामुळे संबंधित माहिती संकलित करण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. उच्च शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात माहिती सादर करण्याचा आदेश विद्यापीठांना दिला आहे. ही माहिती अर्थसंकल्पीय कामकाजासाठी सादर करायची असल्याने आता उच्च शिक्षण विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांना अत्यल्प वेळात माहिती सादर करावी लागणार आहे.