हिमांशू
घरातला आणि बॅंकेतला सगळा पैसाअडका एकदा एकत्र करा. घरातलं आणि बॅंकेच्या सेफ व्हॉल्टमधलं सोनंनाणं एकत्र करा. आता हा सगळा ऐवज रात्रीच्या वेळी बाहेर अंगणात ठेवा. त्या रात्री झोप लागते का पाहा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तसं प्रामाणिकपणे सांगा… असलं काही ऐकल्यावर “हा वेडगळपणा कशासाठी?’ असंच कुणीही विचारेल. परंतु ही दिव्य कल्पना आमच्या सुपीक मेंदूत उगवलेली नसून, ती शेतातल्या काळ्या मातीत उगवलेली आहे. आमच्या एका शेतकरी मित्रानं आम्हाला अशी कल्पना करून पाहायला सांगितलं. “हा खटाटोप कशासाठी,’ असं आम्ही विचारल्यावर तो मित्र म्हणाला, “”दोन लाखाचं पीककर्ज काढलंय. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांची टंचाई असल्यामुळे ब्लॅकनं खत मिळवलं. बियाणंही महागामोलाचं आहे.
स्वस्तातलं घेतलं तर बोगस निघण्याची शक्यता असते. पीक उगवून आल्यावर एकतर तणनाशक वापरायचं किंवा भांगलण करायला रोजानं बायका बोलवायच्या. पीक जरा मोठं झालं की कीटकनाशक फवारायचं. इतकी मोठी गुंतवणूक दरवर्षी करायची; पण कधी अवकाळी पाऊस पीक धुऊन नेतो, कधी गारपीट होते, कधी वादळानं पीक आडवं होतं, कधी जंगली जनावरं पिकावर ताव मारतात. जर आलंच पीक हातात, तर कर्ज भागवण्यापुरताही भाव मिळत नाही. इतकी अनिश्चितता बघितलीय कधी? आमची संपत्ती, आमचं सर्वस्व पिकाच्या रूपानं नेहमी उघड्यावरच असतं.”
आमच्या शेतकरी मित्रानं सांगितलेली ही व्यथा अनेक वर्षांनी आठवण्याचं कारण म्हणजे, “पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको,’ असं म्हणून कीटकनाशकाची बाटली तोंडाला लावणारा तरुण शेतकरी. कटेवर कर ठेवून अवघ्या विश्वाची काळजी वाहणाऱ्या पांडुरंगाच्या पंढरपूर तालुक्यातला. विष पिताना तो “फेसबुक लाइव्ह’ करू शकतो म्हणजेच इंटरनेट त्याच्या बांधावर पोहोचलंय. मग सुख का नाही पोहोचलं? “माझं आयुष्य एवढंच होतं,’ असं 26 वर्षांचा तरुण कसं म्हणू शकला? “शेतकरी असमर्थ, दुबळा असतो,’ हे त्याचं ठाम मत कसं बनलं? हतबलतेमुळे बांधावर प्राण सोडणाऱ्या या तरुण मित्राला काय म्हणायचं?
“सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही,’ असं म्हणून दातानं कीटकनाशकाची बाटली उघडून तोंडाला लावण्याचं धारिष्ट्य कसं होत असेल? रात्री-अपरात्री पिकाला पाणी पाजायला ही मंडळी अंधारात कशी जात असतील? दिवसा वीज द्यावी, या साध्या मागणीसाठी त्यांना आंदोलन करावं लागतं. पण शहरांची भूक शमल्यावर रात्रीच शेतकऱ्यांना वीज दिली जाते. नुकसान करणाऱ्या वन्यजीवांना मारता येत नाही, कारण गुन्हा दाखल होतो. वन्यजीवांनी फाडलेल्या गाई-वासरांची भरपाई मिळण्यासाठी मात्र वर्ष-वर्ष ताटकळावं लागतं.
“उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ हे समीकरण उलटं कधी आणि कसं झालं, हे शेतकऱ्यांना समजलंच नाही! आत्महत्यांचा आकडा शेकड्यातून हजारात आणि हजारातून लाखात कधी पोचला, हेही समजलं नाही. अन्नदाताच अन्नपाण्याला मोताद झाला. मुलगा शेती करतो म्हटल्यावर कुणी मुलगी देईनासं झालं. ज्याच्याकडे प्रचंड ज्ञान आहे, त्या बळीराजाला शहरी संस्कृतीनं अडाणी ठरवलं. ही मानसिकता बदलत नाही तोवर शेतकऱ्याच्या मरणाचा असाच “लाइव्ह’ सोहळा पाहायचा!