पुणे -कृषी आणि सहकार क्षेत्रात राजू शेट्टी यांचे मोठे योगदान आहे. त्या आधारावर राज्यपालांकडे सादर केलेल्या 12 जणांच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये त्यांचे नाव दिले आहे. त्याबाबत अंतिम निर्णय राज्यपालांकडून झालेला नाही. तेच याबाबत अंतिम भूमिका घेतील.
तरीही राजू शेट्टींकडून अशी विधाने कशी केली जातात, याचे आश्चर्य वाटते. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे, त्यामुळे त्यांनी काय वक्तव्य करावे हा त्यांचा विषय आहे, अशी मल्लिनाथी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते.
ईडीच्या कारवाईबाबत पवार यांना विचारले असता, या यंत्रणेचा याअधी देशात अशा स्वरूपाचा कधीही वापर झाला नाही. मात्र, सध्याचे केंद्र सरकार विरोधकांना नमविण्यासाठी या यंत्रणांचा वापर करत असल्याचे दिसून येते. हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दक्षिणेतल्या काही भागात सुरू आहे.
दरम्यान, दिल्लीत 14 महिन्यांपासून शेतकरी घर-दार सोडून आंदोलन करत आहे. मात्र, असंवेदनशील केंद्र सरकारची त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.
केंद्रातील विचारांच्या लोकांनी तारतम्य ठेवावे
देशावरील करोनाचे संकट अद्याप गेले नाही. याबाबत केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी मार्गदर्शन करत आहे. तसेच राज्यांनी आणखी काही दिवस खबरदारी घेण्याचे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सर्व घटकांशी चर्चा करत आहेत.
ज्यावेळी केंद्र सरकार अशी भूमिका घेते, त्यावेळी कमीत कमी केंद्र सरकारच्या विचाराच्या राज्यातील लोकांनीही तारतम्य ठेवायची आवश्यकता होती. यापेक्षा अधिक सांगायची गरज नाही, अशा शब्दात मंदीर उघडण्यासाठी शंखनाद करणाऱ्यांना शरद पवार यांनी टोला लगावला.