पुणे – राज्यात यंदा झालेला अपुरा पाऊस त्यामुळे पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे, अशातच कोयना धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाणी कमी करून ते पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे, यासाठी वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाणी कमी केल्यानंतर किती वीज विकत घ्यावी लागेल याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५ टी.एम.सी. आहे. एकूण जलाशयाच्या प्रमाणात या वर्षी जवळपास २० ते २५ टक्के पाणीसाठा कमी आहे. कोयना धरणातील ६७ टक्के पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्यात येते. मात्र, या वर्षी जलसाठा कमी असल्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, शेतीसाठी पाणी देणे आवश्यक आहे.
त्यामुळे यामध्ये दहा टीएमसी पाणी कमी केल्यानंतरचा आराखडा आणि पंधरा टीएमसी पाणी कमी केल्यानंतरचा आराखडा तयार करून किती वीज खरेदी करावी लागेल, याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जलसंपदा, महानिर्मिती आणि महाजेनको विभागातील अधिकाऱ्याना दिल्या होत्या. त्यानुसार या विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.