बाहेर पडण्याचा पर्याय निवडणाऱ्यांचा फेरविचार होणार नाही
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पदभरती परीक्षांच्या प्रक्रियेत सर्वसाधारण गुणवत्ता यादी, पसंतीक्रम नोंदवणे आणि पदभरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग आऊट) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. आता या निर्णयांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
“एमपीएससी’ने शनिवारी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 साठी पहिल्यांदाच सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. त्यानुसार उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग आऊट) नोंदवण्यासाठी 20 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक “एमपीएससी’ने आज प्रसिद्ध केले आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षाची सर्वसाधारण यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून, उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रांची फेरपडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो. ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी न्यायालयात, न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे. तसेच ऑप्टिंग आऊटसाठीचा ऑनलाइन दुवा (वेबलिंक) 20 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
“एमपीएससी’ने पसंतीक्रम नोंदवण्याबाबत काही सूचनाही उमेदवारांना केल्या आहेत. पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग, पदांकरिता पसंतीक्रम सादर करतील, केवळ त्याच संवर्ग, पदांवरील निवडीसाठी त्यांचा विचार करण्यात येईल. दिलेल्या मुदतीनंतर संवर्ग, पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवारांची विनंती मान्य केली जाणार नाही. भरतीप्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम शिफारशीसाठी विचार करण्यात येणार नसल्याचे “एमपीएससी’ने परिपत्रकात नमूद केले आहे.
ऑप्टिंग आऊट म्हणजे काय?
एमपीएससीच्या पदभरती परीक्षा राज्यभरातील लाखो उमेदवार देतात. त्यात आधी निवड झालेले काही उमेदवार पुन्हा परीक्षा देतात. या परीक्षेत संबंधित उमेदवाराने निवड होऊनही अपेक्षित पद न मिळाल्याच्या कारणास्तव ते पद न स्वीकारल्यास ते पद रिक्त राहते. त्यामुळे अन्य होतकरू उमेदवारांची संधी गमावली जाते. या पार्श्वभूमीवर आयोगाने उमेदवारांकडून पदांच्या पसंतीक्रमाचे पर्याय मागवून घेऊन भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग आऊट) देण्याची पद्धत सुरू केली आणि त्याची अंमलबजावणी होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून स्वागत होत आहे.