पुणे –पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कामकाज अखेर प्रभारी कुलगुरूंकडे सोपविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी विद्यापीठाची सूत्रे हाती घेतली आहेत. आता, विद्यापीठातील प्रशासनावर अंकुश, अधिकार मंडळातील ठरविक सदस्यांची मक्तेदारी मोडीत काढीत विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आव्हान नव्या प्रभारी कुलगुरूंकडे पुढे राहणार आहे.
राज्य शासनाच्या नव्या विधेयकास अद्याप राज्यपालांनी मंजुरी दिली नाही. त्यामुळे प्रचलित पद्धतीने होणारी कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली. त्याचाच परिणाम म्हणजे पुणे विद्यापीठाची कुलगुरू निवड प्रक्रिया सुरूच होऊ शकली नाही. तथापि, राज्यपालांनी प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. काळे यांच्याकडे पदभार सोपविला. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी आणि एक हजार महाविद्यालय तथा संस्था अशी व्याप्ती असलेल्या पुणे विद्यापीठाचा कारभार सर्वांना विश्वासात घेऊन चालविणे हे तितकेच आव्हानात्मक आहे.
पुणे विद्यापीठ हा नेहमीच विद्यार्थी केंद्रित राहिला आहे. विद्यापीठास आदिवासी, ग्रामीण आणि शहरी या भागांचा विचार करून सर्वसमावेशक निर्णय घ्यावा लागतो. शिक्षण संस्थांच्या दबावात अथवा अधिकार मंडळाच्या सदस्यांच्या आग्रहाखातर विद्यार्थी हित बाजूला ठेवून निर्णय घेतल्यास त्याचे पडसाद समाज माध्यमातून उमटत असतात. त्यामुळे विद्यापीठाचा आवाका आणि इतिहास लक्षात घेऊन प्रभारी कुलगुरूंना पाऊल उचलावे लागणार आहे.
विद्यापीठातील राजकारण…
विद्यापीठाला एखाद्या चुकीच्या निर्णयावरून अनेकवेळा सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांतून होणाऱ्या टीकेला सामोरे जावे लागते. काही कालावधीसाठी हा निर्णय स्थगित केला जातो. काही काळानंतर पुन्हा तोच निर्णय पुढे रेटला जातो, नकळतपणे राजकीय समीकरणे सुरू असतात. या सर्व राजकारणांना बाजूला ठेवत धाडसाने निर्णय घेणे नव्या कुलगुरूंना क्रमप्राप्त ठरणार आहे.
परीक्षेचे नियोजन आवश्यक…
करोनाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा पूर्णत: बोजवारा उडाल्याचा सर्वांनी अनुभवला. त्यावरून विद्यापीठाचे अधिकार मंडळातील सदस्य व परीक्षा नियंत्रकातील समन्वय नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे दिसून आले. नंतरच्या टप्प्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मागील अनुभव लक्षात घेता योग्य पद्धतीने ऑनलाइन परीक्षा घेतली. आता मात्र दोन वर्षानंतर आणि दोन महिने चालणारी ऑफलाइन परीक्षा योग्य पद्धतीने आणि त्याचा निकाल वेळेत लागणे ही प्रमुख कामांवर अधिक लक्ष नव्या प्रभारी कुलगुरूंना द्यावे लागणार आहे.