पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) व राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) या परीक्षा घेण्याबाबत राज्य शासनाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
“टीईटी’ घोटाळ्यामुळे शासनाने परीक्षा परिषदेतील बहुसंख्य कामकाजाला “चाप’ लावला आहे. टीईटी, संगणक व मॅन्युअल टायपिंगच्या परीक्षांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत. इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. मात्र, ही परीक्षा कधी घ्याययी याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. सध्या परीक्षा परिषदेत विविध परीक्षांची जबाबदारी असलेल्या खासगी कंपनीचे काम तुर्तास थांबवले आहे. ही स्थगिती उठविण्यात आली नाही. त्यामुळे विविध परीक्षांचे निकाल, परीक्षा यांबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.
परीक्षा, निकाल याबाबत मार्गदर्शक सूचना, निर्देश मिळावेत यासाठी परीक्षा परिषदेकडून शासनाला पत्रही पाठवले होते. त्यानुसार केवळ एनटीएस, एनएमएमएस या परीक्षा परिषदेनेच घेण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.