पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य मंत्रिमंडळाने पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. वनाज ते चांदणी चौक १.१२ किलोमीटर लांबीची आहे.
या मार्गिकेवर दोन स्थानके प्रस्तावित आहेत. रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) मार्गिकेची लांबी ११.६३ किलोमीटर असून या मार्गिकेवर ११ स्थानके प्रस्तावित आहेत. या मान्यतेमुळे आता चांदणी चौक ते वाघोली असा एकसलग सर्वांत मोठा ३० कि.मी. लांबपल्ल्याचा मेट्रो मार्ग होणार आहे.
पुण्याच्या वाहतूक विकासात या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेट्रो मार्गिकेसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
शिवाय त्यांच्या कार्यालयातील प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरींग युनीटच्या) माध्यमातून पुण्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या प्रकल्पांचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. मान्यता दिलेले प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावे, यासाठीही या कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, नव्या मार्गिकांना मान्यता दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आणि राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. या मार्गिकांमुळे नागरिकांना वाहतुकीचा पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होऊन शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. लवकरच या मार्गिकांचे काम सुरू करण्याचा प्रयत्न असेल.
वनाज ते चांदणी चौक लांबी १.१२ कि.मी
रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) मार्गिका ११.६३ कि.मी.
एकूण मेट्रो मार्ग १२.७५ कि.मीमध्ये १३ स्थानके
प्रकल्पाचा खर्च ३ हजार ७५६ कोटी
केंद्र व राज्य शासनाचा वाटा प्रत्येकी रु. ४९६ कोटी
केंद्र व राज्य शासनाचे दुय्यम कर्ज प्रत्येकी रु. १४८ कोटी
द्विपक्षीय, बहुपक्षीय संस्थांचे कर्जसहाय्य रु. १ हजार ९३५ कोटी
३ हजार २२६ कोटी रुपये केंद्र शासनाच्या अनुदानासाठी पात्र
शहराचा औद्योगिक विकास आणि विस्तार वेगाने होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे निर्माण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी दूर होऊन प्रदूषणाचे प्रमाणही कमी होणार आहे. नव्याने मंजूर झालेल्या मेट्रो मार्गिकांमुळे उपनगरातील नागरिक वेगवान वाहतूकीद्वारे शहराशी जोडले जातील. – अजित पवार, उपमुख्यमंत्री