बेलसर,(वार्ताहर)- पुरंदर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. पाण्याची अत्यंत दुर्भीक्ष परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पुरंदर परिसरात दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे.सध्या विहिरिंची पाणी पातळी घटली आहे. त्यातच पुरंदरचा राजा समजला जाणारे अंजीर आता दुष्काळ सामना करीत आहे.पाण्याची अत्यंत कमी उपलब्धता असल्याने शेतकर्यांच्या समोर झाडे जगवायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील शेततळ्यांनी देखील तळ गाठला आहे. सध्या अंजीराचा मिठ्ठा हंगाम सुरू झाला आहे; मात्र अंजीर उत्पादकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. बागांना पाण्याची कमतरता भासत असल्याने अंजिराच्या आकारमानावर मोठा परिणाम झाला असल्याचे शेतकरी सांगतात.उष्ण व सतत बदलणारे हवामान यामुळे अंजीर बागेत फळधारणा देखील अत्यल्प झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अंजीर बागेला उत्पादन खर्च जास्त येतो. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.तर सध्या एका डजन पेटीसाठी 280 रुपये बाजारभाव मिळत आहे; परंतु पाण्याची अत्यंत कमी उपलब्धता असल्याने बाजारात फळे जात नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
हक्काचे पाणी मिळावे
पुरंदर तालुक्यात दिवे, सोनोरी, गुर्होळी, काळेवाडी, वाघापू, राजेवाडी, वाल्हे परिसरात मोठ्या प्रमाणात अंजीर बागा आहेत. तालुक्यातील सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजना दुरुस्तीसाठी बंद आहे. योजना सुरू झाल्यानंतर अंजीर फळबागा असलेल्या परिसराला समान पाणी वाटप करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तरच इथल्या अंजीर सीताफळ बागांना जीवदान मिळेल आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळावे असे आवाहन शेतकरी वर्गातून येत आहे.