पुणे -सर्वसामान्य नागरिकांच्या प्रशासकीय पातळीवरील न सुटलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र, या सुनावणीसाठी सोमवारी महापालिकेत बोलावलेल्या 40 ते 50 नागरिकांना तब्बल चार तास आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ताटकळत ठेवण्यात आले. येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरेशी आसन व्यवस्था नव्हती. तसेच पिण्यासाठी पाणीही नव्हते.
लोकशाही दिनासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना सकाळी साडेदहा वाजता वेळेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. तसेच वेळ निघून गेल्यास पुन्हा वेळ मिळणार नाही असेही दरडावण्यात आले. त्यामुळे, सकाळी साडेनऊ वाजेपासूनच नागरिकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर गर्दी केली. मात्र, त्यानंतर तब्बल चार तासांनी म्हणजे दुपारी अडीच वाजता नागरिकांना सुनवाणीसाठी बोलविण्यात आले. त्यानंतर नागरिकांचे केवळ अर्ज घेऊन त्यांना बोलूनही न देता केवळ अर्ध्या मिनिटात बाहेर काढत 3 वाजता हा लोकशाही दिन गुंडाळण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
राजकीय नेत्यांना हवा तेवढा वेळ
लोकशाही दिनादिवशी आयुक्तांनी नागरिकांना वेळ देणे अपेक्षित असते. पण, या कालावधीत सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना आयुक्त वेळ देत होते. याबाबत नागरिकांनी तक्रार केली, की “ही पूर्वनियोजित भेट होती’ असे सांगत बोळवण केली जात होती. या चार तासांत आयुक्तांनी दोन बैठका आणि एक उद्घाटनाचा कार्यक्रमही घेतला. त्यामुळे आयुक्तांच्या कामाचे आधीच नियोजन ठरले होते, तर आम्हाला चार तास कशाला बसविले? असा सवालही या वेळी संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. मात्र, त्याला प्रशासनाकडूनही काहीच उत्तर देण्यात येत नव्हते.