पुणे –महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरच आक्षेप घेणाऱ्या मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून शहराध्यक्षपदी मोरे यांचे खंदे समर्थक आणि महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर शहर मनसेत मोठी उलथा-पालथ झाली. शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, मोरे यांनी आपल्या अध्यक्षपदाची मुदत संपल्याने बाबर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत आपण मनसेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच येत्या दि. 9 एप्रिलला होणाऱ्या ठाकरे यांच्या उत्तर सभेला जाणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले आहे.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालीसा भोंगाव्यावर लावाव्यात, असे आदेश दिले होते. मात्र, प्रभागात बहुतांश नागरिक मुस्लीम असल्याने मोरे यांनी सर्वधर्म समभावाचा नारा देत प्रभागात शांतता ठेवण्यासाठी भोंगे लावणार नसल्याची भूमिका घेतली. यावरून मनसेच्या काही शहर पदाधिकाऱ्यांनी थेट मोरे यांना लक्ष्य करत त्यांची तक्रारच पक्षाध्यक्षांकडे केली. या वादाचे पडसाद गुरूवारी उमटले. स्वत: ठाकरे यांनी बाबर यांना मुंबईत बोलवित, त्यांना थेट शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे पत्र दिले.
पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार काम करणार : बाबर
मनसे शहराध्यक्षपदाचा पदभार साईनाथ बाबर यांनी स्विकारला. यावेळी पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसारच आपण काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोरे हे पक्षातच राहणार असून माझ्या सोबत कार्यरत राहणार असल्याचेही बाबर यांनी स्पष्ट केले. मनसे नेते बाबू वागसकर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या नियुक्तीनंतर सर्वांनी बाबर यांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील तीन पक्षाच्या सर्व विभागांच्या तातडीनं बैठका बोलविण्यात आल्या आहेत. तर, वसंत मोरे यांची 3 मार्च 2021 मध्ये शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हे पद एक वर्षासाठी होते. त्यांची मुदत संपल्याने बाबर यांची निवड झाल्याचा खुलास मनसे नेते वागसकर यांनी केला. तसेच, कोणी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर ते सहन केले जाणार नसल्याचा इशाराही वागसकर यांनी दिला.
राज ठाकरे तीन दिवस पुण्यात…
मनसेतील या वादानंतर दि. 15 ते 17 एप्रिल असे तीन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात मुक्कामी असणार आहेत. या वेळी पक्ष संघटनेबाबत तसेच पक्षातील अंतर्गत वादांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षातील या वादामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्वत: मनसे अध्यक्ष या तीन दिवसांत पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.