पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वातंत्र्य चळवळीपासून ते आजपर्यंतच्या सामाजिक चळवळीत अखंडपणे ९४ वर्षांची यशस्वी वाटचाल करणाऱ्या दैनिक “प्रभात’तर्फे जागतिक महिला दिनाच्या औचित्याने “प्रभात नारी सन्मान सोहळ्या’चे मंगळवारी (दि. १२ मार्च ) टिळक स्मारक मंदिरात आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यानिमित्ताने दरवर्षी ‘तर्फे गौरव केला जातो. यंदा शुभांगी तांबट, डॉ. मनीषा सोनवणे, ज्योत्स्ना गर्गे, जयश्री साकोरे, स्वाती डिंबळे या महिलांना कृतज्ञतापूर्वक सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून “क्रस्ना डायग्नोस्टिक लि.’ च्या मॅनेजिंग डायरेक्टर पल्लवी जैन, अपर पोलीस अधीक्षक अनुजा देशमाने, दैनिक “प्रभात’च्या संचालिका वृषाली गांधी, “अयूर मूड फ्रेशनर’ कंपनीच्या उज्ज्वला जगताप – कासुर्डे उपस्थित होत्या. “आॅक्सिरिच’ प्रस्तुत या सोहळ्याला “दि काॅसमाॅस को-आॅप. बॅंक लि’, “अयुर मूड फ्रेशनर-खुशियों का टाइम बूस्टर’, “रिव्हील क्रिएशन्स प्रा. लि.’ यांचे प्रायोजकत्त्व लाभले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला “रुमानी एन्टरटेन्मेंट’चा “इमॉर्टल मेलोडिज – अॅन इन्स्ट्रुमेंटल ट्रिब्युट’ हा खास वाद्यांचा कार्यक्रम झाला. प्रेक्षकांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. प्रास्ताविक आणि स्वागत दैनिक “प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी केले. तर, आभार श्रीनिवास वारूंजीकर यांनी मानले. सन्मानार्थी महिलांनी यावेळी मनोगत व्यक्त करत आपले कार्य उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या या वाटचालीला उपस्थितांनीही कृतज्ञतापूर्वक सलाम केला.
मनोगत
प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा हक्क : स्वाती डिंबळे
रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची आज खूप वाईट अवस्था आहे. करोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. एक पाण्याची बाटली आणि बिस्किटपुडा कोणालाही जड नाही, प्रत्येकाने रस्त्यावरील व्यक्तीला तेवढे द्यायचा प्रयत्न कर. जेथे शक्य नसेल तेथे मला फोन करा, आपण सगळे मिळून कार्य करूया. परमेश्वराने आपल्याला एक रस्ता दिला आहे,
त्या रस्त्यावर त्या मार्गाने आपल्याला चालायचे आहे. शाबासकीची थाप मिळाली याचा आनंद आहे. साडेचारशे लोकांचे अनुभव आहेत. मानसिक रुग्णांसाठी काम करत असताना त्यांना चांगले उपचार आणि जीवनही द्यायचे आहे. असे रुग्ण घराघरात होत आहेत. माणूस म्हणजे टिश्यूपेपर नाही. त्याला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्या माणसामध्ये आपण स्वत:ला पारखले तर आपण कोणालाही दु:ख देणार नाही, असे मनोगत स्वाती डिंबळे यांनी व्यक्त केले.
मुक्त हस्ताने मदतकार्याची आवश्यकता : शुभांगी तांबट
भटका विमुक्त समाजासाठी आमची संस्था कार्य करते. त्याचे नाव “भटके विमुक्त विकास परिषद’ आहे. त्याचे बहुतेक काम हे लातूर, सोलापूर, धाराशिव या भागांत चालते. त्यांची एक प्रतिनिधी म्हणून मी पुण्यात कार्य करते. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला आहे.
आपण कोणत्या घरात जन्माला यायचे, हे काही आपल्या हाती नसते, त्यात आपले काही कर्तृत्त्वही नाही. परंतु आपली जी भावंडे अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात आली नाहीत. दुर्दैवाने व्यसनाधीनता, बेरोजगारी यांचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे नकळत गुन्हेगारीकडे ही पिढी वळत आहे. अशा मोठ्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे काम आमची संस्था करत आहे. आपल्यासारख्या सहृदय व्यक्तींनी मुक्तहस्ताने आमच्या या कार्याला मदत करावी, एवढीच इच्छा आहे.
भिक्षेकरी हे कष्टकरी व्हावेत : डॉ. मनीषा सोनवणे
नऊ वर्षापासून “डॉक्टर्स फॉर बेगर्स’ या संस्थेच्या माध्यमातून काम करतो. भिक्षेकऱ्यांमध्ये जातो, बसतो, खातो, पितो. त्यांच्यासोबत नाते निर्माण करतो. ते करत असताना त्यांना आवाहन करतो, की तुम्ही काही तरी काम करा. व्यवसाय करायला आम्ही मदत करतो. कोणीही भीक मागू नये किंवा याचना करू नये असा आमचा प्रयत्न आहे.
त्यासाठी आम्ही काम करतो त्यामुळे समाजाने आम्हांला “डॉक्टर्स फॉर बेगर्स’ किंवा “भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर’ अशी पदवी दिली आहे. इतर अॅकॅडमिक पदव्या कितीही असल्या तरी “भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर’ या पदवीने आम्हांला भिक्षेकऱ्यांतील माणूस वाचायला शिकवले. दोनशे भिक्षेकऱ्यांना आतापर्यंत व्यवसाय टाकून दिले आहे. ५२ मुलांचा शिक्षणाचा खर्च हाती घेतला आहे. याबरोबर १,१०० भिक्षेकऱ्यांना वैद्यकीय सेवा देतो. भिक्षेकरी कष्टकरी व्हावे, पुढे ते गावकरी व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे.
सगळे मिळून समाज घडवण्याचा विचार करू : अनुजा देशमाने
नोकरीच्या ३१ वर्षांच्या कार्यकाळात कोणताही सण-समारंभ असो आम्ही रस्त्यावरच असतो. हा गणवेश, हे स्टार्सच आमचा दागिना आहेत, आम्ही समाजासाठी हे व्रत स्वीकारले आहे.
१९९२ साली एमपीएससीमध्ये येताना याची एवढी जाणीव नव्हती. मुलाखतीमध्ये विचारले होते, आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे, तुम्ही काम कसे करणार? त्यावेळी राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी आपल्यासमोर आहेत अशा काही स्त्रिया आहेत त्या समोर असताना आपण मला हा प्रश्न विचारत आहात, असा प्रतिप्रश्न केला. सिलेक्ट होणार नाही वाटले होते पण झाले.
१९०९ साली जी क्रांती झाली, तो दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करत आहोत. परंतु त्यामागे अनेक करुण कहाण्या आहेत. त्यावेळी महिलांनी जो काही त्रास सहन केला, त्यामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. स्त्री-पुरुष दोघेही समान आहे. सगळ्यांना एकत्र येऊन कार्य करण्याची वेळ आली.
समाज हा खूप वेगळ्या मार्गाने जात आहे. आज तरुण पिढीकडे पाहिल, तर व्यथित व्हायला होते. आजची पिढी कुठे चालली आहे? त्यामुळे पुन्हा एकदा वाटते, की प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला यावी आणि त्या घरात शिवबा घडवावा आणि त्यांना सुसंस्कारित होऊन पुढे यावे लागेल. सगळे मिळून समाज घडवण्याचा विचार करूया.
महाराष्ट्रात किती कर्तृत्त्ववान महिला आहेत, ज्या तळागाळात जाऊन काम करतात हे “प्रभात नारी सन्मान’ सोहळ्याच्या निमित्ताने समजले. क्रस्ना डायग्नोस्टिकची माहिती प्रत्येकाला गुगलवर मिळेल. आमची कंपनी सरकारी दवाखन्यातही सेवा पुरवण्याचे कार्य करते. देशातील १८ राज्यांत तीन हजारांहून जास्त ठिकाणी आम्ही सी.टी.-स्कॅन, एम.आर.आय. अशा सेवा देत आहोत.- पल्लवी जैन, मॅनेजिंग डायरेक्टर, क्रस्ना डायग्नोस्टिक प्रा. लि.
तरुणांनी गुटखा, तंबाखू अशा व्यसनांकडे वळण्यापेक्षा “अयूर मूड फ्रेशनर-खुशियों का टाइम बूस्टर’हे प्रॉडक्ट तरुणांच्या पसंतीला उतरले आहे. यामुळे आरोग्यही उत्तम राहते. – उज्ज्वला जगताप-कासुर्डे, “अयूर मूड फ्रेशनर’ उद्योग समूह