वडगावशेरी –राज्यातील महापालिका प्रशासनाने त्यांच्या हद्दीलगतच्या ठराविक अंतरापर्यंत असलेल्या गावांना पाणीपूरवठा करावा, असा नियम पूर्वीपासूनच आहे. आता, महापालिकेची हद्द लोहगाव, वाघोलीपर्यंत गेली आहे. तर, केसनंद, भावडी, आव्हाळवाडी आणि लोणीकंद ही गावे पालिका हद्दीच्या अगदी जवळ आहेत. या नियमानुसार महापालिका प्रशासनाला या गावांनाही पाणी देणे बंधनकारक ठरणार आहे. यावर महापालिका काय निर्णय घेणार याकडे या गावांचेही लक्ष आहे.
पुणे शहर विशेषत: शहराच्या पूर्व भागासाठी भामा आसखेड प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. आता, नव्यानेच महापालिकेत समावेश झालेल्या गावांना पाणी पुरवठ्याची जबाबदारी महानगरपालिकेची असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पालिकेत समावेश झालेल्या लोहगाव, वाघोली या परिसराला भामाआसखेड प्रकल्पातूनच पाणी देण्यासंदर्भातचा प्रस्ताव जिल्हा प्रशासकांकडून यापूर्वीच तयार केला गेला आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाकडे तो पाठविण्यात आल्यानंतर या प्रस्तावाला तत्वत: मंजुरीही मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.
राज्य शासनाने लोहगाव, वाघोली गावाचा समावेश महापालिका हद्दीत करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच राजकीय मंडळींना या गावांचा पाणी प्रश्न उचलून धरला. तसेच, ड्रेनेज लाइन, वाहतूक कोंडी असे प्रश्न सोडविण्याची हमी शासनाने द्यावी, अशी अट नागरिकांनी घातली होती. याशिवाय वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या भागाचा सर्वांगिण विकासाचा आराखडा (डिपी) तयार करण्याचीही मागणी होत होती. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत शासनाने पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचा पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत समावेश करण्यात आला. आता, भामाआसखेड पाण्याची मागणीही लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्यामूळे वेगाने विकसीत होणाऱ्या लोहगाव, वाघोली परिसरासह हद्दीलगतच्या गावांनाही मुबलक पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
महापालिका हद्दीलगतच्या पाच कि.मी.पर्यंतच्या गावांना पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा केला पाहिजे. हा राज्य शासनाचा नियम असून तसा अद्यादेश यापूर्वीच काढण्यात आलेला आहे. त्यामुळे हा नियम पालिकेवर बंधनकारकच असणार आहे. ही बाब लक्षात घेत यापुढील काळात लढा देण्यात येईल.
– ऍड. अशोक पवार,
आमदार, शिरूर-हवेली