पुणे – महापालिकेकडून शहरातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत मुलांना दिल्या जाणार्या शिष्यवृत्तीची बिले तयार झाली असून पुढील दोन ते तीन दिवसात सुमारे दीड हजार मुलांच्या खात्यात डीबीटीद्वारे शिष्यवृत्तीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली.
या वर्षी दहावीसाठी ८ हजार २८७ तर बारावीसाठी २ हजार ५५४, असे एकूण १० हजार ८४१ अर्ज महापालिकेस प्राप्त झाले आहेत. तर, कागदपत्र पूर्ण नसल्याने तसेच अर्धवट अर्ज असल्याने सुमारे १७९३ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. महापालिकेकडून इयत्ता दहावीसाठी भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजने अंतर्गत १५ हजार रुपये तर बारावीसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजने अंतर्गत २५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते.
मागासवर्गीय तसेच खुल्या गटातील शहरात राहणार्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. महापालिकेकडून यंदा अर्जासाठी २९ डिसेंबरची अखेर मुदत देण्यात आली होती. मात्र, पुढील काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका असल्याने शिष्यवृत्ती देण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने समाज विकास विभागाने जसे अर्ज प्राप्त होतील तसेच त्यांची तपासणी सुरू केली होती. त्यामुळे, महापालिकेकडून अर्जांची मुदत संपताच तातडीनं बिले काढण्यास सुरुवात केली असून दीड हजार मुलांच्या खात्यात पुढील दोन ते तीन दिवसात प्रत्यक्षात शिष्यवृत्ती जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
त्या अर्जदरांना आणखी एक संधी
दरम्यान, अर्धवट कागदपत्रे तसेच माहिती नसल्याने फेटाळण्यात आलेल्या अर्जाची संख्या सुमारे १७९३ आहे. त्यामुळे अनेक मुलांना कागदपत्रे न मिळाल्याने अर्ज भरता आलेला नसल्याने महापालिकेकडून या मुलांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. त्याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे उपायुक्त उदास यांनी स्पष्ट केले.