पुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका महापालिकेच्या दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थीच्या शिष्यवृत्तील बसला आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या मुलांच्या कागदपत्रांची तपासणी करून ही बिले लेखापाल विभागाकडे पाठविली आहेत. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने ही बिले थांबविली जाणार आहेत.
आचारसंहितेच्या काळात थेट लाभ देता नसल्याने अनेक मुलांना आता लोकसभा निवडणुकीनंतरच शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर अद्यापही १४०० अर्जांची छाननी सुरू असल्याने त्यांनाही तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.
महापालिकेकडून इयत्ता दहावीसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत १५ हजार रुपये, तर १२ वीसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत बारावीसाठी २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते. मागासववर्गीय, तसेच खुल्या गटांतील शहरात राहणार्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
या वर्षी दहावीसाठी ८ हजार २८७, तर बारावीसाठी २ हजार ५५४ असे एकूण १० हजार ८४१ अर्ज महापालिकेस प्राप्त झाले आहेत. कागदपत्रे पूर्ण नसल्याने, तसेच अर्धवट अर्ज असल्याने सुमारे १७९३ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. या मुलांच्या अर्जांची तपासणी करून जानेवारी महिनाअखेरपासून बिले तयार करून मुलांना डीबीटीद्वारे पैसे दिले जात आहेत.
मात्र, अर्जांची संख्या जास्त असल्याने अनेक बिले तयार झाली असली तरी त्यांच्या खात्यात पैसे टाकले नसल्याने आता महापालिकेने बिले थांबविली आहे. परिणामी अनेक मुलांना शिष्यवृत्तीसाठी आता जून महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, तर १४०० मुलांच्या अर्जांच्या छाननीचे काम अद्यापही बाकी आहे.