पुणे – करोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने पुणेकरांना केले आहे. मात्र, पुणेकर पर्यावरण स्नेही आणि साधेपणाने उत्सव साजरा करत असताना गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन केवळ कागदावर असल्याचे समोर आले आहे.
शहरात शनिवारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार असून आपल्या भागात नेमके कुठे विसर्जन करायचे, फिरता हौद कधी येणार, निर्माल्य संकलनाची सुविधा कुठे आहे याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यातच, महापालिकेस शुक्रवारी सुट्टी असल्याने कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयाकडून या विसर्जनाचे नियोजन केलेले नसल्याचे समोर आले आहे.
मागील वर्षी करोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला तरी, गणेश विसर्जनासाठी महापालिकेने शहरात स्थिर हौदांसह फिरस्त्या विसर्जन हौदांची सुविधा केलेली होती. मात्र, त्यामुळे गणेशोत्सवानंतर शहरात मोठ्या प्रमाणात करोना संसर्ग वाढल्याचे समोर आले.
यंदाच्या वर्षी पुन्हा करोना संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून शहरात तसेच समाविष्ट गावांत कोठेही स्थिर विसर्जन हौद तसेच नदीकाठावर कुठेही विसर्जन घाट ठेवला जाणार नाही, केवळ नागरिकांसाठी फिरते विसर्जन हौद तसेच निर्माल्य संकलनाची सुविधा असणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास केवळ 4 फिरते विसर्जन हौद देण्यात आले असून असे एकूण 60 फिरते हौद असणार आहेत.
मात्र, शहराचा भौगोलिक आकार पाहता एका प्रभागासाठी एकच फिरता हौद मिळणार आहे. तर शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहाव्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. तर, दरवर्षी पालिकेकडून नागरिकांना विसर्जन तसेच निर्माल्य संकलनाची माहिती त्या त्या भागात आधीच दिली जाते.
त्यामुळे आता नागरिक साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास तयार असतानाच फिरत्या हौदांची मुबलक सुविधा तसेच मूर्ती संकलनासह निर्माल्य संकलनाबाबत कोणतीही जनजागृती पालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयस्तरावर करण्यात आलेली नाही. त्याचा परिणाम शनिवारी होणाऱ्या दीड दिवसांच्या विसर्जनावर होणार आहे.
घाट केले बंद
महापालिकेकडून नदीच्या काठावर असलेले विसर्जन घाट बॅरिकेड्स तसेच बांबू बांधून बंद करण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी मूर्ती संकलन अथवा इतर कोणत्याही सुविधा नाहीत. शहरातील अनेक नागरिकांना अद्यापही विसर्जन घाट बंद ठेवण्यात येणार नसल्याचे माहीत नसल्याने हे नागरिक विसर्जनासाठी या घाटांच्या भागातून नदीपात्रात विसर्जन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र, या विसर्जनास बंदी असल्याचे साधे फलकही अद्याप पालिकेने घाटांच्या ठिकाणी लावलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेचे विसर्जन नियोजन केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट आहे.