पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेपासून करोनाच्या लक्षणांमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्यामुळे बाधिताला शोधणे जिकिरीचे झाले असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, आता मोठ्या संख्येने लसीकरण झाले असल्याने करोनाची लक्षणे सौम्य झाली असून, नवीन बाधित सापडणे कमी झाले आहे.
करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये आलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती होणार नाही. त्यावेळी सौम्य लक्षणे असणाऱ्याची चाचणी करत नव्हते. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यात आणि संसर्गितांचा शोध घेण्यात स्थानिक डॉक्टरांकडून पहिल्या दोन लाटांमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. गेल्या महिन्यात करोनाची बदलती लक्षणे डॉक्टरांच्या निदर्शनास आली. खोकला आणि ताप सामान्यत: येतोच. मात्र, एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना याच स्वरूपाची लक्षणे आढळून आली. त्यावेळी यातील बहुतांशजण उपचारांनी बरे झाले. काही जणांना ताप आल्यानंतर आठ ते नऊ दिवसांनी चव आणि वास गेल्याचे दिसून आले.
त्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील एक दोघांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले बाकीचे घरीच बरे झाले, असे तज्ज्ञांकडून मत मांडण्यात आले. पूर्वी ताप आलेल्या दहा रुग्णांमध्ये सात जणांना करोनाची लागण झाल्याचे दिसून येते. मात्र, आता हे प्रमाण तीनवर आले आहे. करोना लसीचा बूस्टर डोस कधी मिळणार याची कल्पना नाही. काही जणांना लसीचा दुसरा डोस घेऊन सहा महिने होऊन गेले आहेत. त्यांनी आता फ्लूचा डोस घेणे आवश्यक आहे, असे काही तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
लसीकरणामुळे करोनाची लक्षणे सौम्य झाली आहेत. तसेच नवीन बाधितांची संख्याही घटली आहे. जोपर्यंत नवीन व्हेरियंट सापडत नाही तोपर्यंत तिसरी लाटेची शक्यता नाही. असे असले तरी नागरिकांनी करोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
– डॉ. डी. बी. कदम, अध्यक्ष टास्क फोर्स