नवी दिल्ली : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली. दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे.त्यासाठी एक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Shivshahir Babasaheb Purandare was witty, wise and had rich knowledge of Indian history. I had the honour of interacting with him very closely over the years. A few months back, had addressed his centenary year programme. https://t.co/EC01NsO1jc
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
“मला शब्दांच्या पलीकडे वेदना होत आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. त्यांची इतर कामेही स्मरणात राहतील,” असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट केले.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली.