– शेरखान शेख
शिक्रापूर – गेली अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत गावागावांत बोलबाला सुरू होता. त्यामुळे कित्येकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. त्याच पार्श्वभूमीवर इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरु केलेली होती. परंतु अचानकपणे निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर होताच इच्छुकांमध्ये धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नुकत्याच पार पडत असताना ग्रामपंचायत तसेच सोसायट्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले अनेकजण सुरु असलेल्या ग्रामपंचायत तसेच सोसायटी निवडणुकीमध्ये आपली ताकद पणाला लावल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी आपल्या जिल्हा परिषद गट,
पंचायत समिती गणात उमेदवारी तसेच निवडणुकीची तयारी सुरू केली. असतानाच शिरुर तालुक्यात जिल्हा परिषदचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढविण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आपल्या गटात कोण कोणती गावे येणार याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर अनेकांनी आपापल्या गावामध्ये जोरदार तयारी सुरू करत वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करत त्याला देणगी, बैलगाडा शर्यतींना देणगी यांसह प्रत्येक कार्यकर्त्यांचा वाढदिवस, कार्यक्रम, उद्घाटने, लग्न सोहळ्याला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचे प्रयत्न केले. इच्छुकांनी लाखो रुपये खर्च केलेले असताना आपल्याला कशी उमेदवारी मिळेल याची व्यूहरचना प्रत्येकजण आखू लागले आहेत.
तर काहींनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी जनसंपर्क सुरु केले असताना काहीजण सध्या आपले पक्ष देखील बदलू लागल्याने नागरिकदेखील त्यांच्या पक्षाच्या संभ्रमात पडल्याचे चित्र निर्माण झाले आहेत, मात्र अचानक निवडणुका पुढे ढकलल्याचे जाहीर होताच इच्छुकांची पुन्हा धाकधूक वाढू लागली आहे. आता अजून किती दिवस खर्च करायचा तसेच निवडणुका जाहीर होईपर्यंत अजून काय घडामोडी घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिरमोड तर होणार नाही ना?
निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपल्या भागातील कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांना मदत करत स्पर्धा पार पाडल्या. तसेच कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला खर्च करत कार्यकर्ते आपलेसे केले मात्र आता निवडणुका लांबणीवर गेल्याने इच्छुक शांत होऊन कार्यकर्त्यांचे कार्यक्रम बंद झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड तर होणार नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.