पुणे –भारतीय संस्कृतीमध्ये गंगा दर्शनाची प्रथा आहे. तीर्थयात्री घरी परतताना त्यांचे दर्शन घेण्याची आपली संस्कृती आहे. वैश्विक संस्कृतीची सुरुवात सरस्वती नदीच्या मुखातून होते. सरस्वती नदीच्या उगमापासून भारतीय संस्कृतीचा प्रवाह प्रवाहित होऊन जगाला, सुख, शांती, समाधान, विद्या आणि ज्ञान आत्मसात करण्याची शक्ती देते, असे उद्गार संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी काढले.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातर्फे उत्तराखंडातील बद्रिनाथ धाम येथील माणा गावात उभारलेल्या “श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिरा’ची निर्मिती करून वचनपूर्ती केली. यासंदर्भात आयोजित पुणे रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास, हभप बापूसाहेब मोरे देहूकर, पत्रकार बाळासाहेब बडवे, उषा कराड, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, डॉ. सुचित्रा कराड- नागरे हे उपस्थित होते.
प्रा. कराड म्हणाले, भारताचे शेवटचे टोक असलेल्या गावात हे मंदिर निर्माण केले आहे. जगातील सर्व विद्यापीठांना ज्ञानाचा संदेश देण्याचे कार्य येथून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.