वाफगाव -यंदा अतिवृष्टी होऊनही पूर्वेकडील चिंचबाई गाव, जऊळके बुद्रुक, मांदळवाडी, वाकळवाडी, चौधरवाडी, वरूडे, गोसासी, पूर, कनेरसर या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतातील पिके पाण्याअभावी करपू लागली आहे. तळी, नाले, ओढे डिसेंबर अखेर कोरडे ठक पडले असून फेब्रुवारी अखेर पिण्याचे पाणी पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. यामुळे मार्चपासून टॅंकर सुरू करावे लागणार आहे.
या भागात तळी, नाले असून गळतीमुळे पाऊस संपल्यावर महिनाभरातच तळी रिकामी होतात. यामुळे याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या भागात ओढा नदी, यांवर बंधारे बांधण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. पूर्वेकडील 12 गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहे. पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत सामूहिक वैयक्तिक शेततळे, तसेच ओढ्यावर सीएनबी, गॅबीयन बंधारे बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी वाणी, मंडल अधिकारी गावडे यांनी केले आहे.
तर प्रत्येक गावात ओढ्याचा वापर शेतरस्त्यासाठी करत असल्यामुळे बंधारे बांधण्यासाठी अडचण येत आहे. तरी शेतकऱ्यांनी पर्यायी रस्ता तयार करून ओढ्यावर बंधारे बांधल्यास शेतीसाठी नक्कीच फायदा होईल, असे कृषी सहाय्यक गर्जे, बांगर यांनी सांगितले. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी चिंचबाईगावचे सरपंच संतोष गार्डी यांनी केली. यासाठी ग्रामपंचायत सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.