पुणे – जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रचारांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. थेट सरपंच निवडीत खुल्या जागांसाठी सर्रास धनशक्तीचा वापर केला जात आहे. यातून स्थानिक राजकारणातील निकष बदलून जात आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामपंचायतींची निवडणूक खर्चिक होत आहे. हा खर्च सर्वसामान्य कार्यकर्ते, सूज्ञ मतदारांना डोळे दीपावणारा ठरत आहे. या निवडणुका अशाच महागड्या होत गेल्या तर धनशक्तीपुढे जनशक्तीचा निभाव लागणार नाही.
मागील अडीच वर्षांपूर्वी राज्यातील सत्तातंर झाल्यानंतर महाविकास आघाडीने थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द केला होता. त्यावेळी राज्यातील एक हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका या प्रभागनिहाय घेत आरक्षण, निवडून आलेल्या उमेदवारांमधून सरपंच निवड केली होती.
मात्र, गेल्या पाच महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर गावगाड्यातील वातावरण चांगलेच तापले. थेट सरपंच निवडीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राजकारणातील निकष आणि संदर्भ बदलत आहेत. याचे दूरगामी परिणाम भविष्यात गावागावांत होणार आहेत. यातून एक सक्षम, प्रबळ, अभ्यासू, सर्वसमावेशक उमेदवार निवडून देण्याची संधी मतदारांना मिळाली आहे. थेट निवडीतून गुण- दोषांची चर्चा सुरू झाली. त्यामुळे गावांतील राजकीय दिशा बदलली जात आहे.
सर्वसमावेशक उमेदवार
ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वसमावेशक उमेदवार म्हणून प्रभावी ठरत आहे. थेट सरपंच निवडीसाठी उमेदवार देताना तो सर्वसमावेशक उमेदवार देण्याची धडपड पॅनलप्रमुखांनी केली आहे. सर्व घटकांमध्ये त्या उमेदवारांचा संपर्क असावा, याची दक्षता घेतली आहे. थेट निवडीत हा निकष पॅनलच्या विजयाला हातभार लावणारा ठरत आहे.
धनशक्तीचा प्रचंड वापर
ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच निवडीत धनशक्तीचा वापर प्रचंड प्रमाणात केला जात आहे. पहिल्या क्रमांकावर खुल्या गटातील सर्व साधारण पुरूष आणि त्यानंतर सर्वसाधारण महिला या आरक्षित जागेसाठी जोरदार काट्याची लढत होते. त्यामुळे या जागा प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. यावेळी प्रतिष्ठा आणि अस्तित्वासाठी मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर केला जात आहे.
प्रबळ आणि स्वच्छ प्रतिमा
सर्वसमावेशक उमेदवार देताना प्रबळ आणि स्वच्छ प्रतिमेचा विचार केला आहे. तसेच गावातील कोणत्याही एका वॉर्डात प्राबल्य असलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे लढतीत कोणतेही कुचकामी दुवे राहणार नाहीत. यासाठी स्थानिक नेत्यांनी सतर्कता जपली आहे.