राजगुरूनगर -सोमवारी होळीच्या दिवशी झालेल्या वादळात खेड तालुक्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाले. सर्वाधिक फटका आंब्याच्या झाडांना बसला. यावर्षी भरपूर आलेला मोहोर आणि लहान आंबे वादळात पडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
गेली चार-पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, त्याचे रूपांतर सोमवारी वादळात झाले. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला वादळाची तीव्रता जास्त असल्याने काही घरांवरचे पत्रे उडाले. काही ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने होळीच्या दिवशी काही गावांमध्ये अंधार पसरला. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक गावात यात्रा महोत्सव आहे;
मात्र वातावरणातील बदल आणि वादळ यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने ऐन यात्राकाळात गावात अंधार आहे. खरोशी, डेहणे, शेंदुर्ली आदी गावात यात्रा निमित्ताने हरिनाम सप्ताह आहेत. वादळ आणि पावसाच्या हलक्या सारी पडल्याने गावातील उत्सवावर संकट आले आहे.
सोमवारी झालेल्या वादळी पावसात खरोशी गावात सलग 4 ते 5 विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला. ऐन होळी पेटवण्याचा सुमारास वादळ आले. त्यामुळे होळीच्या सण उत्साहात साजरा करण्यात आला नाही. खेड पश्चिम भागात वादळाची तीव्रता होती तर संपूर्ण तालुक्यातही वादळ व पावसाच्या हलक्या सरी पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या वादळामुळे आणि त्यात पडणाऱ्या हलक्या सरींमुळे वीटभट्टी धारकांची धांदल उडाली. कच्च्या विटा झाकण्यासाठी कसरत करावी लागली.
तालुक्यात झालेल्या वादळामुळे आंब्याचा मोहोर गळून पडला काही आंब्याला आंबे लागल्याने तेही वादळात पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावर्षी आंब्याच्या झाडांना चांगला मोहोर आला होता; मात्र गेली तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि वादळ व प्रवासाच्या हलक्या सरी पडल्याने नुकसान झाले.
खेडच्या पश्चिम भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी. वादळात पडलेले विजेचे खांब पूर्ववत करून वीजपुरवठा सुरळीत करावा.
– विजय कौदरे, सामाजिक कार्यकर्ते खरोशी