खेड शिवापूर -बनावट प्रतिज्ञापत्र करून त्या आधारे खोटी वारस नोंद करून जमीन विक्री केल्याचा प्रकार श्रीरामनगर (ता. हवेली) येथे घडला आहे.पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूरजवळील श्रीरामनगर ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीत आठ वारस असतानाही खोटे प्रतिज्ञापत्र करून ग्रामसेवकांशी संगनमत करून एकट्याच्या नावाने वारस नोंद करून ही जमीन परस्पर गावातीलच व्यक्तीला विकण्याचा प्रकार नुकताच उघडीस आला आहे.
श्रीरामनगर येथे कै. श्रीपती वाव्हळ यांच्या नावे मिळकत क्र. 43,46, 47 या जमिनी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर या जमिनीसाठी एकूण आठ वारसदार असताना त्यांच्या मोठ्या मुलाने खोटे बनावट प्रतिज्ञापत्र करून ते ग्रामपंचायतीमध्ये सादर केले. या प्रतिज्ञापत्राची कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता तात्कालीन ग्रामसेवक विजय गरुड यांनी संगनमत करून सदर
जमिनीवरती खोटी वारस नोंद करून दिली.
विशेष म्हणजे अवघ्या आठ दिवसांमध्ये या जमिनीची विक्री ही केली गेली. यावरून झालेला प्रकार हा संगनमताने आणि आर्थिक प्रलोभन दाखवून करण्यात आलेला आहे, असा आरोप वाव्हळ कुटुंबीयातील सदस्यांनी केलेला आहे. या घटनेची रीतसर चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाव्हळ कुटुंबीयांनी पत्रकार परिषदे दरम्यान केली. याबाबत श्रीराम नगर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विजयकुमार गरुड यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
श्रीरामनगर ग्रामपंचायत मासिक मीटिंगचे प्रोसिडिंग गेल्या वर्षभरापासून लिहिले गेलेले नाही, यामुळे ग्रामसेवकांनी नेमका काय घोळ घातला आहे, याची नेमकी माहिती सध्यातरी मला देता येणार नाही.
– शिवाजी खंडाळकर, सरपंच, श्रीरामनगर
या प्रकरणांमध्ये माझे अनुमोदक म्हणून नाव कसे आले, याबाबत मी अनभिज्ञ आहे. या प्रकरणाशी माझा कसल्याही प्रकारचा संबंध नाही.
– संतोष वाव्हळ, ग्रामपंचायत, सदस्य
या घटनेबद्दल मला माहिती मिळाली असून, विस्तार अधिकाऱ्यांकडून रीतसर चौकशी करून माहितीत तथ्य असल्यास संबंधितावरती योग्य ती कारवाई केली जाईल.
– भूषण जोशी, गटविकास अधिकारी, हवेली