वाल्हे -मागील काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होत असून कडाक्याची थंडीच्या दिवसात अवकाळी पावसांच्या सरी कोसळल्याने वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. गुरुवारी सायंकाळी एक तास अवकाळी पावसाच्या रिमझीम सरी कोसळल्या. अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने मात्र बळीराजाची झोप उडाली आहे.
वाल्हे परिसरातील दौंडज, पिसुर्टी, वागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी आदी परिसरात गुरूवारी अवकाळीच्या सरी कोसळल्या.
अवकाळी पावसाने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. उभ्या पिकांना फटकाही बसून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अवकाळीमुळे कांदा, गहू, ज्वारी, हरभरा, मका आदी पिकांवर परिणाम होणार आहे. धुके आणि अवकाळीमुळे गहू पिकावर तांबेरा रोग पडण्याची शक्यता निर्णाम झाली आहे. हरभरा पिकावर घाटे आळी येण्याची शक्यता असते. कांदा आणि मका पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू शकतो.
शेतकऱ्यांना बसणार फटका?
मागील काही दिवसांपासून कडाक्याची पडलेली थंडी अन् त्यानंतर येणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. विशेषतः वाल्हे परिसरातील अंजीर उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा गहू व हरभरा पिकांचे नुकसान होणार आहे. अशी चर्चा शेतकरीवर्गामध्ये आहे.